Just another WordPress site

भारताआधीच ट्रम्प यांच्या परस्पर ‘संघर्षविराम’ घोषणेवरून विरोधकांची केंद्र सरकारवर सडकून टीका !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१२ मे २५ सोमवार

भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय काश्मीर प्रश्नावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मध्यस्थी केली व दोन्ही देशांच्याही आधी त्यांच्यातील संघर्षविरामाची परस्पर घोषणा केली.सदरहू या एकूणच घटनाक्रमावर विरोधी पक्षांकडून रविवारी जोरदार टीकेची झोड उठविण्यात आली असून भारताने अधिकृतरित्या जाहीर करण्याआधीच ट्रम्प यांनी केलेली ‘संघर्षविराम’ घोषणा ही काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा थेट प्रयत्न असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे तसेच या मुद्द्यावर तातडीने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा विरोधी पक्षांनी पुनरुच्चार केला आहे.सध्याच्या भारत-पाकिस्तान संघर्षात ट्रम्प यांनी हस्तक्षेप केल्याचे सांगून काँग्रेसने यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली असून ‘या संकटाच्या प्रसंगी सर्व विरोधी पक्ष सरकार सोबत आहेत परंतु अमेरिकेच्या अध्यक्षांनी पहिल्यांदा युद्धबंदीची घोषणा केली हे हैराण करणारे आहे असे पक्षनेते सचिन पायलट यांनी म्हटले आहे.तर अमेरिकेतील कोणीतरी ट्रम्प यांना सांगावे की काश्मीरचा मुद्दा बायबलसारखा हजार वर्षे जुना नाही व तो २२ ऑक्टोबर १९४७ रोजी ७८ वर्षांपूर्वी सुरू झाला होता तेव्हा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता अशा शब्दांत काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी टोला लगावला आहे.राजद खासदार मनोज झा यांनी ट्रम्प यांना त्यांचे सामान्य ज्ञान सुधारण्याचा सल्ला दिला असून संपूर्ण जगाचे ‘सरपंच’ बनण्याचा ट्रम्प यांचा हा प्रयत्न भारतासारख्या लोकशाही देशासाठी अजिबात योग्य नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

कोणत्याही अन्य देशाच्या अध्यक्षांनी नव्हे तर पंतप्रधान मोदींनी ही युद्धबंदी जाहीर केली असती तर आनंद झाला असता.सिमला करार (१९७२) पासून आम्ही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीला विरोध करत आहोत व आता आपण तेच स्वीकारले आहे का ? आपण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वाटाघाटी करण्यास का सहमत झालो आहोत ? पाकिस्तान दहशतवादासाठी आपल्या भूमीचा वापर करणार नाही याची अमेरिका किंवा त्याचे अध्यक्ष हमी देतील का ? युद्धबंदी असो वा नसो पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा पाठलाग सुरूच राहिला पाहिजे याची खात्री सरकार देईल का ? यांसारखे प्रश्न एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.तर ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही ट्रम्प यांच्या घोषणेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून ट्रम्प यांच्या त्या पोस्टनंतर आणि विरोधकांना या मुद्द्याबद्दल चुकीची माहिती कशी देण्यात आली यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.सरकार पंतप्रधान मोदी सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याची हमी देत नाही तोपर्यंत अन्य पक्षांनी बैठकीला उपस्थित राहू नये असे आवाहन कपिल सिब्बल यांनी केले आहे.दिल्लीतील काँग्रेसच्या २४-अकबर रस्ता या मुख्यालयाबाहेर लावलेले एक पोस्टर रविवारी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले असून ‘इंदिरा होना आसान नहीं। इंडिया इंदिरा को मिस कर रहा है।’ अशा उपरोधिक ओळी लिहिलेल्या या पोस्टरवर दिवंगत इंदिरा गांधी यांचे १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धच्या काळातील छायाचित्रही आहे.पहलगाम दहशतवादी हल्ला ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारातील ताज्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मागणीचा पुनरुच्चार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केला असून ‘संसदेचे विशेष अधिवेशन पुढील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपला सामूहिक संकल्प प्रदर्शित करण्याची संधी असेल’ असे राहुल गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.