दहिगाव येथील पाईपलाईन ठेकेदाराकडून अनेक वेळा फुटल्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी !! अपुरा पाणीपुरवठा व चिखलाच्या त्रासामुळे ग्रामस्थांमध्ये संताप !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २६ शुक्रवार
तालुक्यातील दहिगाव येथील विरावली रस्त्यावर ठेकेदाराकडून अनेकवेळा पाईप लाईन फुटत असल्यामुळे पाणी पुरवठ्यावर त्याचा मोठा विपरीत परिणाम होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान दहिगाव विरवली रस्त्यादरम्यान गावालगत असलेल्या नाल्यावर पुलाचे काम सुरू असून हे काम करीत असलेल्या ठेकेदाराकडून गेल्या महिनाभरात अनेक वेळा पाईपलाईन फुटलेली आहे.सदरहू सुरेश आबा नगरात होणारा पाणीपुरवठा अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही परिणामी ग्रामस्थ प्रशासनावर व ठेकेदारासंदर्भात संताप व्यक्त करीत असून देखील संबंधित ठेकेदार मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.सध्या उष्णतेची लाट आहे व त्यामुळे प्रत्येक ग्रामस्थाला पाण्याची अत्यावश्यक गरज असते.आधीच विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे व त्यातच ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी रोजचे वाया जात आहे व त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल साचत असून येजा करणाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तसेच आताही नव्याने गेल्या काही दिवसापासून ही पाईपलाईन फुटलेली असून ठेकेदार मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.सदरहू या वारंवार होणाऱ्या प्रकाराकडे संबंधित लक्ष देऊन लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदाराला समज द्यावी आणि पाईपलाईन जोडून घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.