“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन आहे” !! आदित्य ठाकरे यांचा खळबळजनक दावा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०२ जुलै २६ गुरुवार
शिवसेना ठाकरे गटातून दुसऱ्यांदा पक्षांतर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ झाली असून ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे तर आदित्य ठाकरे यांच्या जवळचे मानले जाणाऱ्या सचिन अहिर यांनीही नुकताच शिंदे गटात प्रवेश केला असून त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणून वर्णी लागली आहे.ठाकरे गटाच्या फुटीबाबत बोलतांना आदित्य ठाकरेंनी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमकुवत करण्याचा डाव असल्याचे म्हटले आहे.
इंडिया टीव्हीशी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटातील फुटीवर भाष्य केले आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रातील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करत असून फडणवीस यांच्या राष्ट्रीय राजकारणातील स्थानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे असाही आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,राष्ट्रीय राजकारणात आणि राज्यात घडामोडी घडत असून त्यात शिवसेनेचा (ठाकरे) नाहक बळी जात आहे.महाराष्ट्रात ताज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’चा भाग आहेत.‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ याबद्दल अधिक बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकेकाळी राष्ट्रीय राजकारणात ज्यांना संभाव्य दावेदार समजले जात होते त्यांना एक एक करून पद्धतशीरपणे बाजूला सारले गेले.सध्या राज्यात एकनाथ शिंदेंच्या राजकीय हालचाली या भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावर होत आहेत व यातून देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत राहणार नाही असा प्रयत्न केला जात आहे.तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांतच केंद्रीय मंत्रिमंडळात दिसतील असाही दावा आदित्य ठाकरे यांनी केला असून महाराष्ट्रात सध्या जी परिस्थिती आहे ती कायम नसेल असेही ते म्हणाले.“देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री म्हणून हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन आहे हे माझे शब्द लिहून ठेवा” असाही दावा आदित्य ठाकरेंनी केला.तसेच एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळवण्याचा प्रयत्न करतील असेही ते म्हणाले.आपल्या दाव्याला दुजोरा देण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांचे उदाहरण दिले.“नितीन गडकरी तिसऱ्यांदा भाजपाचे अध्यक्ष होऊ घातले तेव्हा त्यांच्याबद्दलचे वाद समोर आले.पूर्ती घोटाळा आणि इतर विषय समोर आले.शिवराज सिंह चौहान मध्य प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून नावाजले गेले असतांना त्यांना अचानक केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्यात आले असे आदित्य ठाकरे म्हणाले.