“पंतप्रधानांनी त्यांची पदवी आधी सार्वजनिक करावी तरच मी माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेन” !! ‘कॉक्रोच’ जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची परखड भूमिका !!
छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०४ जुलै २६ मंगळवार
“माझ्या शिक्षणावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी आणि मला लक्ष्य करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की,माझ्याकडे शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्जाची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. मात्र पंतप्रधानांनी त्यांची पदवी आधी सार्वजनिक करावी.त्यांनी ती जाहीर केली तरच मी माझी सर्व कागदपत्रे सार्वजनिक करेन” असे वक्तव्य ‘कॉक्रोच’ जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केले आहे.छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर,शिक्षणाबाबत होणारे आरोप आणि आगामी वाटचाल यावर दिपके यांनी आपली परखड भूमिका मांडली.आपल्या परदेशातील शिक्षणावर आणि त्यावरील खर्चावर उपस्थित झालेल्या प्रश्नांना उत्तर
देताना दिपके म्हणाले,“माझे शिक्षण परदेशात झाले असून त्यासाठी लागणाऱ्या शिष्यवृत्ती (Scholarship) आणि शैक्षणिक कर्जाचे (Education Loan) सर्व अधिकृत पुरावे माझ्याकडे आहेत.सरकार विरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) सारख्या यंत्रणांचा वापर केला जात आहे.मला सांगायचे आहे की,माझ्याकडे ईडी किंवा सीबीआय पाठवत असाल तर त्यासोबत पंतप्रधानांची पदवीही पाठवून द्या.” असे अभिजित दिपके यांनी म्हटले आहे.
संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना दिपके यांनी सांगितले की,५ ऑगस्ट रोजी माझ्या निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आणि कोअर कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.यावेळी पक्षाचा पुढील अजेंडा काय असावा आणि कोणती लोकहितवादी ध्येय-धोरणे घेऊन पुढे जायचे यावर या बैठकीत सविस्तर मंथन केले जाईल.तसेच झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की,कालच माझी झारखंडमधील विद्यार्थ्यांशी विस्तृत चर्चा झाली असून ‘कॉक्रोच’ जनता पार्टी पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभी आहे व जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत त्यांनी आपले आंदोलन मागे घेऊ नये असे आवाहन मी त्यांना केले असून आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्यास आमचा पक्ष कटिबद्ध आहे असे अभिजित दिपके यांनी नमूद केले आहे.राजकारणातील प्रवेशाबाबत विचारले असता दिपके यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर तीव्र
नाराजी व्यक्त केली.सध्या अस्तित्वात असलेल्या राजकीय पक्षांच्या कारभाराला जनता कंटाळली असून लोकांमध्ये मोठी निराशा आहे.मात्र सध्या नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याचा आमचा कोणताही विचार नाही.आजच्या राजकीय वातावरणात नवीन पक्ष काढून काय साध्य होणार ? असा प्रती सवाल त्यांनी केला.त्यांनी पुढे सांगितले की,आज देशातील मतदान प्रक्रियेवरच जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असून नागरिक एका पक्षाला मतदान करतात पण निवडून आलेले प्रतिनिधी नंतर पक्ष बदलतात.केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून पक्ष फोडले जात आहेत त्यामुळे सध्या राजकीय पक्षा ऐवजी एका सक्षम जन आंदोलनाच्या स्वरूपातच काम करण्याचा आमचा मानस आहे असे ‘कॉक्रोच’ जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी म्हटले आहे.